अखेर युद्धविरामाची घोषणा;जगाने सुटकेचा निश्वास सोडला
वाॅशिंग्टन : अमेरिका आणि इराणमध्ये अखेर दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली असून पाकिस्तानच्या मध्यस्तीनुसार दोन्ही बाजूंनी परस्परांवर होणारे हल्ले थांबणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली डेडलाइन संपायला एक तास शिल्लक असताना ही घोषणा करण्यात आली.
मागील अनेक दिवसांपासून जगाचे लक्ष ज्या निर्णयाकडे लागले होते, ती घोषणा अखेर आज झाली. यामुळे सगळ्या जगाने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मध्य पूर्वेमध्ये आता पुन्हा एकदा शांतता निर्माण होईल अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात येत आहे.
इराण सीजफायरसाठी तयार झाला असून इराण आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुज पूर्णपणे जलवाहतुकीसाठी खुला करणार आहे. इराणने या जलमार्गावरील वाहतूक नियंत्रित केली होती.
अमेरिकेसोबत चर्चेला तयार असल्याचे इराणने म्हटले असून शुक्रवारपासून पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये
१० एप्रिलपासून ही चर्चा सुरु होईल. युद्धविराम कायम रहावा हाच या बैठकीचा उद्देश असेल. या सीजफायर डीलमध्ये पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली असे वरवर दिसत असले तरी चीन जर यामध्ये पडला नसता तर हा करार होऊ शकला नसता.
चीनच्या हस्तक्षेपानंतर इराणने शेवटच्या क्षणी पाकिस्तानचा दोन आठवड्यांसाठी युद्धविरामाचा प्रस्ताव स्वीकारला. चीन इराणचा महत्वाचा सहकारी आहे. युद्धकाळात चीनकडून इराणला मदत पोहोचवण्यात आली. इराणने आपली भूमिका लवचिक करावी यासाठी चीनने त्यांची समजूत काढली.
दरम्यान, इराणच्या सर्वोच्च सुरक्षा परिषदेने युद्धात दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य केल्याचे जाहीर केले. ही चर्चा म्हणजे युद्ध समाप्ती नाही असे सुद्धा सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने म्हटले आहे.
इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून एक दहा कलमी प्रस्ताव अमेरिकेला पाठवला आहे. यानंतर आता इस्रायलने भूमिका स्पष्ट केली आहे.
अहिंसेची वचनबद्धता, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम ठेवणे, युरेनियम संवर्धनाला मान्यता, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे, सर्व दुय्यम निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सर्व ठराव रद्द करणे, नियामक मंडळाचे सर्व ठराव रद्द करणे, इराणला नुकसान भरपाई देणे, या प्रदेशातून अमेरिकी सैन्य मागे घेणे, लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्धच्या लढाईसह सर्व आघाड्यांवर युद्धविराम, अशा १० मुद्द्यांचा या प्रस्तावात समावेश आहे. परंतु, यातील काही मुद्द्यांना इस्रायलचा आक्षेप असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाने बुधवारी सांगितले की, अमेरिका आणि इराण या दोन देशांत दोन आठवड्यांचा शस्त्रसंधी करार झाला असला तरी, इस्रायलची लेबनॉनमधील हिजबुल्लाहविरुद्ध जी लढाई सुरू आहे, त्यासाठी हा करार लागू नसेल.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे. इराणने तत्काळ होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. अमेरिका, इस्रायल तसेच या प्रदेशातील इतर देशांवरील सर्व हल्ले थांबवावेत, अशी मागणी इस्रायलने केली आहे.
अमेरिका, इस्रायल, आखाती देशांसह जगाला यापुढे आण्विक, क्षेपणास्त्र आणि दहशतवादी धोका निर्माण होऊ नये, हे सुनिश्चित करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना पाठिंबा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
अपराधांना बळी पडलेल्या महिलांची ओळख उघड केल्यास दोन वर्षाचा कारावास
नाशिक प्रकरणातील 'एसआयटी'चा इशारा
नाशिक : भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) नुसार नमूद अपराधांना बळी पडलेल्या महिलांची कोणतीही ओळख उघड करता येत नाही, कोणत्याही बाबतीत पीडित महिलेची ओळख उघड झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) अन्वये गुन्हा नोंद होवून त्यात दोन वर्षाचा कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा नमूद केलेली आहे, असा इशारा नाशिक येथील प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या ( एसआयटी) प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी दिला आहे.
आरोपी अशोक खरात विरुध्द सरकारवाडा पोलीस स्टेशन गु.र.नं.७३/२०२६ बी.एन.एस. कलम ६४ (१), ७४, ३५१(२) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंधक अधिनियम कलम ३(१) (२) अन्वये दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक करत आहे.
सर्व न्युज चॅनल्स, न्युज चॅनल्सचे इन्स्टाग्राम हॅन्डल्स, यु ट्यूब न्युज पोर्टल्स, ऑनलाईन न्युज पोर्टल्स, इन्स्टाग्राम न्युज पोर्टल्स व इतर सोशल मिडीया आधारीत बातमीपत्र धारक यांना विशेष तपास पथकाने सुचना जारी केली आहे. काही बातम्यांमध्ये पीडित महिलेची ओळख उघड होईल असे वक्तव्य, फोटो, व्हीडीओ, पिडीत महिलेचा पत्ता, पिडीत महिलेचे नातेवाईकांची नावे, पिडीत महिलेचे गावाचे नाव, फिर्यादीतील संपूर्ण घटनाक्रम ज्यावरून पीडीत महिलेची ओळख उघड होईल असे वृत्तांकन केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिडीत महिला आणि तिचे कुटूंबीय हे प्रचंड मानसिक तणावात आहेत, असे 'एस आयटी'ने स्पष्ट केले आहे.
सदर गुन्ह्याबाबत बातमी, वृत्तांकन, करताना पिडीत महिलेची ओळख उघड होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. जर आपल्या बातमी मुळे पिडीत महिलेची ओळख उघड झाल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७२ (१) नुसार आपणाविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे सातपुते यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गोव्यातही २५ ते ३० अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ?
भाजप नगरसेवकाचा मुलगा गजाआड
मुंबई: नाशिक मधील लैंगिक अत्याचाराची मालिका विस्तार पावत आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोवा पोलिसांनी सोमवारी सकाळी २० वर्षीय सोहम सुशांत नाईक याला अटक केली. २५ ते ३० अल्पवयीन मुलींचा समावेश असलेल्या एका कथित लैंगिक गैरव्यवहारावरून (सेक्स स्कँडल) उसळलेल्या प्रचंड जनक्षोभानंतर ही अटक करण्यात आली. मादेगाल-काकोरा येथील रहिवासी आणि कुर्चिरेम येथील भाजप नगरसेवकाचा मुलगा असलेल्या नाईकला, नागरिक आणि स्थानिक नेत्यांच्या जमावाने पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले.
प्रकरण उजेडात कधी आले?
हे प्रकरण गेल्या आठवड्यात समोर आले; जेव्हा सोहम सुशांत नाईक याने एका सामाजिक कार्यक्रमात आपल्या सहकाऱ्यांना पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून, आपल्या कृत्यांबद्दल कथितरित्या बढाई मारली. दक्षिण गोव्यात लैंगिक शोषणाच्या चित्रिकरणाबाबतच्या अफवा पसरू लागल्याने, स्थानिक तणाव शिगेला पोहोचला. तथापि, या प्रकरणाबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासूनच दक्षिण गोव्यात सुरू होती. हे प्रकरण एका स्थानिक भाजप नगरसेवकाशी संबंधित असल्याने, कारवाईची मागणी करण्यासाठी स्थानिक नागरिक रविवारी रात्री 'कुडचडे पोलीस ठाण्यासमोर जमले. अखेरीस, पोलिसांनी त्या नगरसेवकाचा मुलगा असलेल्या सोहम नाईक याला ताब्यात घेतले.
ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदीया यांना २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर
पुणे: वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल २०२६ चा पुण्यभूषण पुरस्कार ,ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदीया यांना डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे.
त्याचवेळी सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतिश देसाई यांनी कळविले आहे. पुरस्काराचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे ,सलग ३७ वर्षे संस्थेने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि देशाच्या बाहेर ह्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराचा भव्य उपक्रम राबविला.
अवघे मोगल साम्राज्य हादरवून टाकणाऱ्या बालशिवाजीची ,सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती या नगरीच्या ग्रामदैवतासह वैशिष्ट्यपूर्ण अशा पुण्यभूषण पुरस्काराच्या स्मृतीचिन्हात आहे. रुपये दोनलक्ष रकमेची थैलीही सन्मानित पुणेकरास दिली जाते.
नरेंद्र मोदी; ८,९३१ दिवस सतत सत्तेत
देशातील सर्वाधिक काळ सरकारप्रमुख
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. रविवारपर्यंत (२२ मार्च २०२६), मोदी यांनी विविध सरकारांचे प्रमुख म्हणून एकूण ८,९३१ दिवस कार्यभार सांभाळला आहे. याचा अर्थ असा की, ते आता भारताचे सर्वाधिक काळ सरकारप्रमुख म्हणून कार्य करणारे व्यक्ती बनले आहेत.
या यशासह, त्यांनी यापूर्वी पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे; चामलिंग यांनी सिक्कीमचे सरकारप्रमुख म्हणून ८,९३० दिवस सेवा बजावली होती.
पंतप्रधान मोदी यांच्यासाठी, ही लक्षणीय कामगिरी केवळ एकाच सरकारचे नेतृत्व करून साध्य झालेली नाही. उलट, या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या १५ वर्षांच्या सेवेचा आणि त्यानंतर पंतप्रधान म्हणून सध्या सुरू असलेल्या सलग जवळपास १२ वर्षांच्या कार्यकाळाचा समावेश आहे.
गुजरात आणि संपूर्ण देश अशा दोन्ही पातळ्यांवर सरकारचे नेतृत्व करताना, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या एकूण ८,९३१ दिवसांच्या कार्यकाळात गाठलेल्या प्रमुख टप्प्यांचा आणि कामगिरीचा आढावा घेऊया.
आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी कोणते विक्रम प्रस्थापित केले आहेत?
कोणते विक्रम अजूनही त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत? देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी या, पंतप्रधान मोदींच्या तुलनेत कोणत्या बाबतीत अजूनही आघाडीवर आहेत?
१. गुजरातचे मुख्यमंत्री : (२००१–२०१४)
७ ऑक्टोबर २००१ रोजी नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भूकंपापश्चात निर्माण झालेली आव्हाने आणि राजकीय अस्थिरतेचा काळ अशा परिस्थितीत, केशुभाई पटेल यांची जागा घेत त्यांनी हे पद स्वीकारले.
२००२, २००७ आणि २०१२ अशा सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून, त्यांनी गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला; शिवाय, त्यांच्या शासनपद्धतीला 'गुजरात मॉडेल' म्हणून देशव्यापी लोकप्रियता लाभली.
२. पंतप्रधान म्हणून ऐतिहासिक कामगिरी
(२०१४ ते आजपर्यंत): तीन दशकांनंतर आघाडी राजकारणाचा अंत झाला.
२६ मे २०१४ रोजी, नरेंद्र मोदी यांनी भारताचे १४ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली, भाजपने तीन दशकांच्या कालावधीत पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत (२८२ जागा) मिळवले. या घटनेमुळे आघाडी राजकारणाच्या युगाचा अंत झाला.
सलग तीन कार्यकाळ मिळवून नेहरूंची बरोबरी करत पंतप्रधानपदाच्या सर्वाधिक प्रदीर्घ सलग कार्यकाळाचा इंदिरा गांधींचा विक्रम मोडला.
गेल्या वर्षी, पंतप्रधानपदाच्या सर्वाधिक प्रदीर्घ सलग कार्यकाळाच्या बाबतीत त्यांनी इंदिरा गांधींना (४,०७७ दिवस) मागे टाकले. सप्टेंबर २०२५ मध्ये, आपल्या तिसऱ्या कार्यकाळात असताना, ते सलगपणे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले. शिवाय, सलग दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते काँग्रेस-व्यतिरिक्त पक्षाचे पहिलेच नेते आहेत.
...आणि आता, सरकारप्रमुख म्हणून सर्वाधिक काळ काम करण्याचा विक्रम
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून एकूण ८,९३१ दिवस पूर्ण करून, त्यांनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा विक्रम मोडला आहे; आणि अशा प्रकारे, भारतातील कोणत्याही लोकनियुक्त सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ काम करणारे नेते होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. ही कामगिरी त्यांच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोन्ही पदांवरील कार्यकाळांचा एकत्रित परिणाम आहे.
२०१९ मध्ये, भाजपने ३०३ जागा जिंकून आपले स्थान अधिकच बळकट केले. २०२४ मध्ये, 'एनडीए' (NDA) युतीने २४० जागांसह आपली सत्ता कायम राखली. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर, सलग तीन कार्यकाळांसाठी पंतप्रधानपदी नियुक्त होणारे पंतप्रधान मोदी हे एकमेव पंतप्रधान आहेत. पंतप्रधानपदाच्या सलग कार्यकाळांबाबत इंदिरा गांधींचाही विक्रम मोडला
काकासाहेब गाडगीळ यांच्या अर्धपुतळ्याची दीर्घकाळ उपेक्षा
पुणे: महाराष्ट्रातील एक थोर स्वातंत्र्यसैनिक, प्रभावी वक्ते, लेखक आणि केंद्रीय मंत्री
नरहर विष्णू उर्फ काकासाहेब गाडगीळ यांच्या अर्धपुतळ्याची दीर्घकाळ उपेक्षा सुरू असून सारस बागेजवळील त्यांच्या पुतळ्याची दुर्दशा झाली आहे.
१९७७ च्या सुमारास या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना तत्कालीन काँग्रेस नेत्यांच्या पुढाकाराने झाली होती. अभिनव महाविद्यालयाच्या समोरच्या पुरम चौकात दक्षिण बाजूस एका कोपऱ्यात हा अर्धपुतळा असून देखभालीअभावी दुर्दशा झाली आहे. गाडगीळ यांचे नातू, माजी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी याविषयी खंत व्यक्त केली.
काकासाहेब गाडगीळ (१० जानेवारी १८९६ – १२ जानेवारी १९६६) १९२० पासून काँग्रेस पक्षात सक्रीय होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आठ वेळा कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
१९३४ मध्ये ते केंद्रीय कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवडून आले. ते भारत सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांनी कामगार, खाणकाम आणि ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली.
त्यांनी फाळणीनंतर पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी तसेच दिल्लीच्या विकासासाठी मोठे कार्य केले.
ते पंजाबचे राज्यपाल म्हणूनही प्रसिद्ध होते.
दक्षिण भारतानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच इपीआयक्यू EPIQ सिनेमा लॉन्च
पुण्यातील हिंजवडी येथे ई-स्क्वेअर मल्टीप्लेक्सचे भव्य उद्घाटन
पुणे: क्यूब सिनेमा ने आज पुण्यातील ई-स्क्वेअर सिनेमाजमध्ये आपल्या प्रीमियम लार्ज फॉरमॅट सिनेमा इपीआयक्यू च्या लॉन्चची घोषणा केली. हे पाऊल त्यांच्या लार्ज-फॉरमॅट सिनेमा अनुभवाच्या विस्तारासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. २०१९ पासून दक्षिण भारतात प्रेक्षक आणि तंत्रज्ञांकडून मोठी प्रशंसा मिळवल्यानंतर, इपीआयक्यू आता पहिल्यांदाच महाराष्ट्रात प्रवेश करत आहे, ज्यामुळे आपल्या विशेष तंत्रज्ञान, भव्यता आणि इमर्सिव अनुभवासह भारतातील सर्वात गतिमान सिनेमा बाजारांपैकी एका बाजारात पदार्पण करत आहे.
सुल्लूरपेट, कोयंबटूर, कोझिकोड, मदुरै, तंजावूर, हैदराबाद, त्रिशूर, राजापालयम आणि चेन्नई यांसारख्या दक्षिण भारतातील प्रमुख शहरांमध्ये यशस्वी स्थापना केल्यानंतर, पुण्यातील लॉन्च हा इपीआयक्यू च्या राष्ट्रीय विस्तारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हे भारतीय प्रेक्षकांमध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि इमर्सिव थिएटर अनुभवासाठी वाढती मागणी देखील दर्शवते.
ई-स्क्वेअर सिनेमाजमधील इपीआयक्यू ऑडिटोरियम मोठ्या प्रमाणात, उत्कृष्ट दृश्य स्पष्टता आणि प्रेक्षकांच्या सोयी लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहे. यात भिंतीपासून भिंतीपर्यंत मोठी स्क्रीन, स्टेडियम-शैलीतील आसन व्यवस्था आणि प्रत्येक सीटवरून उत्कृष्ट अनुभव देणारे वातावरण आहे.
पुण्यातील इपीआयक्यू मध्ये Barco 4K RGB लेझर प्रोजेक्शन, Dolby Atmos इमर्सिव साउंड आणि 1.89:1 स्क्रीन रेशो यांसारख्या प्रीमियम तंत्रज्ञानांचा समावेश आहे, जे फ्लॅट आणि स्कोप दोन्ही फॉरमॅटसाठी योग्य आहे. यामुळे उच्च ब्राइटनेस, उत्तम कॉन्ट्रास्ट, अचूक रंग आणि उत्कृष्ट ध्वनी अनुभव मिळतो. चित्रपटांना क्यूबद्वारे विशेषतः इपीआयक्यू साठी ऑप्टिमाइझ केलेल्या डिजिटल सिनेमा पॅकेजेस (DCPs) मध्ये तयार केले जाते, ज्यामुळे मोठ्या फॉरमॅटमध्ये उत्तम गुणवत्ता मिळते.
क्यूब सिनेमा चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष रोहतगी म्हणाले:“इपीआयक्यू ची सुरुवात दक्षिण भारतात झाली आणि वर्षानुवर्षे ते प्रीमियम सिनेमाचे मानक बनले आहे. पुणे आणि पश्चिम भारतात ते आणणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामुळे ते प्रादेशिक नसून राष्ट्रीय ब्रँड बनत आहे. ई-स्क्वेअर हा आमच्यासाठी आदर्श भागीदार आहे.”
ई-स्क्वेअर लीजर प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत पंचामिया म्हणाले “ई-स्क्वेअर सिनेमाजमध्ये आमचा उद्देश नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्तम अनुभव देणे हा आहे. इपीआयक्यू आमच्या मूल्यांचे — भव्यता, तंत्रज्ञान आणि सिनेमाचा जादू — प्रतीक आहे. महाराष्ट्रातील पहिल्या मल्टीप्लेक्सपैकी एक म्हणून आम्हाला हा नवीन अनुभव पुण्यात आणताना आनंद होत आहे.”
इपीआयक्य बद्दल
इपीआयक्यू हा क्यूब सिनेमा द्वारा विकसित केलेला प्रीमियम लार्ज फॉरमॅट सिनेमा संकल्पना आहे. यात Barco उच्च-कॉन्ट्रास्ट RGB लेझर प्रोजेक्शन, 1.89 स्क्रीन रेशो आणि इमर्सिव साउंड तंत्रज्ञान वापरले जाते. कंटेंट 4K रिझोल्यूशनमध्ये तयार केला जातो आणि उच्च गुणवत्तेसाठी विशेष ग्रेडिंग केली जाते. या सिनेमातील प्रत्येक घटक आसन व्यवस्था, दृश्य कोन, ध्वनी आणि प्रकाश असा डिझाइन केला आहे की प्रत्येक सीटवरून सर्वोत्तम अनुभव मिळेल. पहिला इपीआयक्यू स्क्रीन २०१९ मध्ये आंध्र प्रदेशातील सुल्लूरपेट येथे लॉन्च झाला होता.




