भ्रष्टाचारमुक्तीसाठी मूक जन आंदोलन
पुणे: शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी विकास कामे अधिकारी व नगरसेवकांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. निकृष्ट कामाची बीले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांच्या खंडणीची, टक्केवारी आजी, माजी नगरसेवकांना द्यावी लागत आहे.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बीलाच्या टक्केवारी वरुन सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांत जोरदार भांडणे झाली. हाणामारी पर्यंत गेलेल्या या घटनेने पालिकेच्या विकास कामात कामांच्या उत्तम दर्जा पेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा उघडकीस आले आहे.
टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे पालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून टक्केवारीला पायबंद घालण्यासाठी पालिका भवनात भ्रष्टाचार मुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे.
या बाबत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे व पदाधिकारी यांनी पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे.
आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, ''समाजसुधारक
महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यसेनानी गणपतराव नलावडे,जेष्ठ विचारवंत एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब पुरुळेकर, बाबुराव सणस,नामदेवराव मते भाई वैद्य आदींच्या निस्वार्थी व त्यागी नेतृत्वामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली.
याचा विसर अलिकडच्या काळात पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना पडत चालला आहे. पालिकेच्या मुख्यालयातच भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे व विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे कामाच्या टक्केवारीवरुन काल बुधवारी जोरदार भांडण झाले.शहर व जनतेच्या विकासा पेक्षा स्वतः ला टक्केवारी मिळावी यासाठी आजी माजी नगरसेविका अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडण करतात यामुळे पुणेकरांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या घटनेचा आम आदमी पार्टी व पुणेकरांच्या वतीने तीव्र निषेध करतो.''
या कथित टक्केवारी
प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर यावे, ताबडतोब चौकशी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.
या प्रकराची प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत तात्काळ दखल घ्यावी. विषय प्रचंड गंभीर आहे. पुणेकरांच्या पैशांवर टक्केवारीची राजकारण आम्ही सहन करणार नाही,असे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
मुकुंद किर्दत सुभाष कारंडे,निरंजन अडागळे,सतीश यादव, निलेश वांजळे, आरती कारंजवाने, सुरेखा भोसले, सुनीता काळे, सुनील सौदी, थोरात कुमार धोंगडे, इब्राहिम शेख, कुणाल घारे,इकबाल तांबोळी, शेखर ढगे, सुरज सोनवणे,गणेश थरकुडे, उमेश बागडे रुपेश, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, मिलिंद सरोदे,संतोष काळे, गजानन भोसले, डिकरा शेख, उमेश दीक्षित आदी उपस्थित होते.
