पुणे: महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थिती शला सगळे राजकारणी कारणीभूत आहेत. वेगवेगळे वाद निर्माण करुन मराठी माणूस एकत्र येऊच शकणार नाही अशा प्रकारे व्यवस्था पद्धतशीरपणे करून ठेवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या वर्षी राज ठाकरे यांचे व्याख्यान झाले त्यावेळी ते बोलत होते. 'माझ्या मनातला महाराष्ट्र आणि मराठी माणूस ' हा त्यांचा व्याख्यान विषय होता.
अध्यक्षस्थानी व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक होते.
महाराष्ट्रात येऊन कोणी काही वक्तव्य करते अशा शब्दांमध्ये बागेश्वर बाबा यांचे नाव न घेता टीका करत ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली. महाराष्ट्रातल्या संतांनी जात जाती धर्म भेद दूर करण्याचे काम केले परंतु ते आपण विसरलो आहोत. आपण महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो त्यांनी दिलेल्या विचार मात्र पूर्णपणे विसरलेलो आहोत, असे ते म्हणाले.
तामिळनाडू पश्चिम बंगाल मधल्या हिंदीला नकार देणाऱ्या नागरिकांसारखा, भाषिक कडवटपणा असल्याशिवाय मराठी भाषा आपण टिकवू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
मराठी माणूस एकत्र येऊच शकणार नाही अशी पध्दतशीर व्यवस्था
शाळांचे मनमानी पद्धतीने आरटीई प्रवेश
मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन वाढले
मुंबई: खाजगी शाळांमधील २५ टक्के जागांवरील राखीव प्रवेश चालू असून आज त्याची मुदत संपत आहे. अनेक ठिकाणी पालकांना प्रवेश मिळाला आहे, त्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली आहे परंतु शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करीत नाही अशा तक्रारी येत आहेत. संदर्भात 'आप पालक युनियन' कडे अनेक तक्रारी आल्या असून मुदत संपत आली असल्यामुळे पालकांचे टेन्शन मात्र वाढलेले आहे.
आज अखेर प्रवेश झालेल्यांची संख्या मागील वर्षापेक्षा कमी आहे. प्रशासन याबाबतीत पालकांना सक्रिय मदत करत नाही अशा तक्रारी वाढत आहेत. या जागा रिक्त राहणार नाहीत याची जबाबदारी शिक्षण अधिकाऱ्यांची आहे. त्यांच्यावर शिक्षण विभागाचा वचक नाही त्यामुळे याबाबतीत गटशिक्षणाधिकारी पुढाकार घेताना दिसत नाही.
आम आदमी पार्टीच्या 'आप पालक युनियन' चे मुकुंद किर्दत यांनी सांगितले की अनेक शाळा पालकांकडे वेगवेगळ्या कारणाने अतिरिक्त फी रक्कम मागत आहेत.
तिळवनी, हातकणंगले येथील रॉयल इंग्लिश स्कूल, तसेच संजय घोडावत इन्स्टिट्यूट,जयसिंगपूर येथे त्या शाळेच्या नियमित फी मधून केवळ प्रतिपूर्ती रक्कम वजा करून उर्वरित रक्कम पालकांनी भरावी तरच आम्ही प्रवेश देऊ असे सांगितले जात आहे. ही रक्कम ३० ते ६० हजार पर्यंत जाते आहे.
दुसरीकडे मुलुंड पूर्व मधील बॉम्बे प्रेसिडेन्सी स्कूल या शाळेमध्ये नर्सरीला प्रवेश दिला आहे. परंतु सरकारकडून पूर्व प्राथमिक नर्सरीला प्रतिपूर्ती दिली जात नसल्याचे कारण सांगून पालकांकडून पूर्ण पैसे मागितले जात आहेत. ही रक्कम ७५ हजार रुपये आहे. पुणे विभागातील अनेक शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी फी च्या नावाने पैसे मागितले जात आहेत. या खाजगी शाळा मोठ्या ॲक्टिव्हिटी फी नावाने फसवणूक करतात ही भावना वाढीस लागली असून शिक्षणाधिकारी पालकांना सहकार्य करत नाहीत असा अनुभव येत आहे. शासनाची प्रतिपूर्ती रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत असल्यामुळे हे प्रकार घडत आहेत असा आरोप मुकुंद किर्दत यांनी केला आहे.
किर्दत यांनी म्हटले आहे की तर दुसरीकडे ज्याची मुले आरटीई अंतर्गत शिकत आहेत, त्यांनाही अँक्टिव्हिटी फी नावाने अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. हे पैसे ज्यांनी दिले नाहीत त्यांचे रिझल्ट दिले जात नाहीत. पुणे शहरातील पंडितराव आगाशे शाळेत ६००० रुपये दिले तरच रिझल्ट शीट देऊ असे सांगून पालकांना परत पाठवले जात आहे.
माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल
पुणे : घराला ‘घरपण’ देणारी माणसं म्हणून ओळख असलेले डी. एस. कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आत्मविश्वास, जिद्द आणि सकारात्मकतेच्या बळावर त्यांनी कठीण काळानंतर नव्याने उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दीपक सखाराम कुलकर्णी या नावाचा 'डीएसके' असा ब्रॅण्ड पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण करणारे, एकेकाळी हजारो कुटुंबांची घराची स्वप्नं पूर्ण करणारे 'डीएसके' सुमारे ४० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचे प्रमुख होते. मात्र आर्थिक अडचणींमुळे आणि सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या देणी परत करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्या उद्योगसमूहाला मोठा धक्का बसला. या संकटामुळे अनेकांना मोठा मानसिक आणि आर्थिक फटका बसला होता.
या पार्श्वभूमीवर 'डीएसके' यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “मला कोणाचाही एक रुपया बुडवायचा नाही,” असे सांगत त्यांनी पुन्हा व्यवसायात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. सध्याच्या अडचणी तात्पुरत्या असून भविष्यात परिस्थिती निश्चित सुधारेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, “माझी अडचण आज आहे, उद्या असेल; पण परवा नक्कीच नसेल.” गेल्या चार दशकांत गुंतवणूकदारांना नफा दिल्याचा उल्लेख करत, एकाच वेळी सर्वांनी पैसे मागितल्यास कोणत्याही उद्योगासाठी ते परत देणे कठीण असते, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली.
दरम्यान, काही व्यक्तींनी जाणीवपूर्वक अडचणी वाढवल्याचाही त्यांनी उल्लेख केला, मात्र त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता नसल्याचे स्पष्ट केले. “मी शून्यातून विश्व उभारले आहे, ते सहज संपणार नाही,” असे म्हणत त्यांनी आपल्या पुनरागमनाची झलक दिली.
सध्या ते नव्या प्रकल्पांवर काम करत असून पुन्हा एकदा हजारो कोटींच्या व्यवसाय उभारणीची तयारी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे उद्योगक्षेत्रात आणि गुंतवणूकदारांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
आधी चुकीचे काम करणाऱ्या कंपनीस पुण्यात वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम
पुणे महापालिका अंतर्गत मिळकतींचे 'जी आय एस मॅपिंग' चे काम २०१६ साली 'सार आय टी रिसोर्सेस प्रा. लिमिटेड' या कंपनीस देण्यात आले. या कंपनीने चुकीच्या पद्धतीने काम करून हजारो पुणेकरांची मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द केली. यातून नागरीकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आणि गेली चार वर्षे या चुका निस्तरताना नागरीक आणि मनपा प्रशासन दोघांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.
वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पीटी ३ फाॅर्म भरुन मिळकत करात दुरुस्ती करण्याचे काम आजही सुरुच आहे. महापालिकेने नेमलेल्या समितीने या कंपनीने केलेल्या कामाचा छोटा सर्व्हे केला होता आणि या कंपनीने ८८ टक्के ठिकाणी चुका केल्याचा अहवाल या समितीने दिला होता व त्याआधारे महापालिकेने सदरहू कंपनीचे बिल , सुरक्षा ठेव व बॅंक गॅरंटी मिळून जवळपास १२ कोटी रुपये जप्त करण्याचा निर्णय घेतला.
अशा कंपनीला महापालिकेने पुन्हा कोणतेही काम देणे अपेक्षित नसताना पुणे महापालिकेने प्रशासक राज संपता संपता फेब्रुवारी २०२६ मध्ये या कंपनीला पुणे शहरातील वृक्षगणनेचे तब्बल ३० कोटी रुपयांचे काम देण्याचा निर्णय घेतला. सध्या स्थायी समितीने अशा सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करण्याचे ठरवले आहे. यामध्ये सदरहू कंपनीचा पूर्व इतिहास लक्षात घेऊन या निर्णयाचा फेरविचार करावा अशी आमची आग्रहाची मागणी आहे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.
SAAR IT Resources Pvt Ltd ही २००८ मध्ये स्थापन झालेली, मुंबईस्थित एक अग्रगण्य ITES आणि तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी GIS, सल्लागार सेवा, सॉफ्टवेअर विकास, आउटसोर्सिंग आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन (Business Process Management) यांसारख्या सेवा पुरवते.
अंजली चंद्रकांत पाटील यांचा 'गीताव्रती' पदवीने गौरव
पुणे: सौ. अंजली पाटील यांना 'गीता परिवार' या जगप्रसिद्ध आध्यात्मिक संस्थेच्या वतीने प्रतिष्ठित 'गीताव्रती' ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध उच्चारण, पाठांतर आणि सखोल अर्थाचा अभ्यास पूर्ण केल्याबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात येते.
सौ. अंजली पाटील या स्वतः एक कॉस्ट ऑडिटर असूनही, त्यांनी व्यस्त कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत गीतेचा सखोल अभ्यास केला. 'गीता परिवार' या संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन वर्गांच्या माध्यमातून त्यांनी गीतेचे १८ अध्याय पूर्ण केले. केवळ पाठांतर नव्हे, तर गीतेतील कर्मयोग आपल्या आचरणात आणण्यासाठी त्यांनी हे शिक्षण पूर्ण केले आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गीता परिवार’ ही संस्था जगभरात गीतेचा प्रचार करत आहे. या संस्थेचा 'गीताव्रती' हा एक सन्माननीय टप्पा असून, जो साधक गीतेच्या शुद्ध पठणात नैपुण्य मिळवतो, त्याला ही पदवी दिली जाते.
लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक; मुंबई महानगर पालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी शुक्ला (वय ३८) आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख हळूहळू जवळिकीमध्ये बदलली. याच काळात शुक्लाने आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींचा दाखला देत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे सांगितले आणि त्या महिलेवर विश्वास बसवून तिला लग्नाचे आश्वासन दिले.
या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवले. मात्र कालांतराने शुक्ला लग्नाचा विषय टाळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवत शुक्लाला अटक केली आहे. सध्या पोलीस त्याची सखोल चौकशी करत असून या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासले जात आहेत. तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आणि पुढे त्यांची पूर्णवेळ सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यावर असे गंभीर आरोप झाल्याने प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आय.एल.एस. विधी महाविद्यालयाला बेकायदेशीर शुल्क भोवले
पुणे : प्रसिद्ध आय.एल.एस. विधी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुलीप्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली. संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने शासनाने नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अशासकीय अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून अपारदर्शक पद्धतीने व बेकायदेशीर शुल्क आकारणी करण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण विभागाने सह संचालक (उच्च शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय चौकशी समितीची स्थापना करून सखोल चौकशी केली.
या चौकशीअंती सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, संबंधित महाविद्यालयाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०१ (७) च्या तरतुदींचे उल्लंघन करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची पूर्वमान्यता न घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२, व २०२४-२५ दरम्यान विद्यार्थ्यांकडून अनधिकृत शुल्क वसूल केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याचिकाकर्त्याकडून १७ विविध शीर्षकांखाली एकूण १,०४,८६३ रुपये इतकी रक्कम बेकायदेशीररीत्या वसूल करण्यात आल्याचे आढळून आले आहे. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्या कार्यालयाद्वारे संबंधित महाविद्यालयास सदर रक्कम फी भरल्याच्या दिनांकापासून ६ टक्के व्याजदराने संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
पुणे महानगरपालिकेत सल्लागारांचा नाहक सुळसुळाट
पुणे: महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर असताना सध्या सल्लागारांचा सुळसुळाट झालेला आहे. प्रत्येक कामासाठी सल्लागार नेमावा लागतो ही शोकांतिका आहे. सल्लागार संस्थेकडे तज्ज्ञही नसतात. ते त्यांचे फक्त प्रोफाईल दाखल करतात.
'आपले पुणे आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेचे
उज्ज्वल केसकर,सुहास कुलकर्णी,प्रशांत बधे यांनी ही बाब पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
केसकर यांनी सांगितले की पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक तज्ज्ञ इंजिनियर असताना सल्लागार का नेमले जातात हा प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी सक्षम असताना सल्लागार नेमून आपण जबाबदारी ढकलतो आहोत.
पुढच्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला न घेता अधिकाऱ्यांना काम करण्यासाठी उद्युक्त करावे आणि त्यांच्यावर विश्वास टाकावा त्यामुळे खो-खोचा खेळ संपेल, असे संबंधित पत्रात 'आपले पुणे आपला परिसर' ने म्हटले आहे.
२९ एप्रिल ते १२ मे दरम्यान राज्यात हाय अलर्ट
पुणे: विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये २९ एप्रिल ते १२ मे दरम्यान, सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने उन्हात बाहेर जाऊ नये, कारण हवामान विभागाने सांगितले आहे की तापमान ४५ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान थेट सूर्यप्रकाश टाळावा. ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी कारण अनेकांना ही माहिती पहिल्यांदाच मिळत असेल, असे आवाहन नागरिक संरक्षण महासंचालनालयाने केले आहे.
जर कोणाला घुसमटल्यासारखे वाटले किंवा अचानक तब्येत बिघडली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील दरवाजे उघडे ठेवावेत जेणेकरून वायुवीजन होईल. मोबाईलचा वापर कमी करावा, मोबाईल फुटण्याची शक्यता असू शकते. शक्यतो दही, ताक, बेलफळाचा रस इत्यादी थंड पेयांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक संरक्षण महासंचालनालयाने नागरिकांना आणि रहिवाशांना पुढील बाबींविषयी इशारा दिला आहे. ४७ अंश सेल्सिअस ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढणारे तापमान आणि पुढील काही दिवसांत क्युम्युलस ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतांश भागात उष्ण व दमट वातावरण निर्माण होईल.
पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ प्यावेत. गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नये. वीजमीटरवर जास्त भार टाकू नये. घरातील वापरात असलेल्या भागातच एसी वापरावा, दोन ते तीन तासांनी ३० मिनिटे विश्रांती घ्या. बाहेर तापमान ४५–४७ अंश सेल्सिअस असताना घरातील एसी २४–२५ अंश सेल्सिअस वर ठेवावा, त्यामुळे आरोग्य चांगले राहील, असे
विंचू आणि साप यांच्यापासून सावध रहावे, कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर येऊन थंड जागा शोधण्यासाठी बागेत किंवा घरात येऊ शकतात,अशी सूचना देण्यात आली आहे.
मनोहरमामा भोसले ; दुनिया झुकती है हे सिध्द करणारा बदमाष
आधी डीएडच्या परीक्षेत नापास; नंतर बोंबिल विकले आता म्हणे बाळूमामाचाअवतार
इंदापूर : स्वतःला बाळूमामाचा अवतार म्हणवून घेणारा आणि भविष्य बदलवण्याचे आमिष दाखवत भक्तांची फसवणूक करणारा तथाकथित अध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी अटक केली. भोसलेवर याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार सारखे ३ गंभीर गुन्हे दाखल होते. अनेक मोठ्या नेत्यांसोबत भोसले याचे फोटो आहेत.
इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी असलेला भोसले असलेला भोसले डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत असे. एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षानंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचा आशीर्वाद असल्याच्या थापा मारत करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्याने स्वतःचा मठ थाटला होता
साक्षात बाळूमामा येत असल्याचे ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्याच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली.
आधीच्या ३ गुन्ह्यांत जामीनावर असलेला मनोहर पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या कोठडीत आहे.
कुडूवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह जादुटोणाविरोधी कलमान्वये गुन्ह्याबद्दल फिर्याद दिलेला तक्रारदार गौतम कसबे हा रिअल इस्टेट धारक असून आपल्या व्यवसायामध्ये वारंवार येणाऱ्या अपयशामुळे भोसले याच्या संपर्कात आला. या दरम्यान मनोहर याने पूर्जा-अर्चा केल्यास संकटे दूर होतील आणि व्यवसायात प्रगती असे सांगून २ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ५० हजार रुपये त्याला दिले. परंतु यानंतरही त्याच्या व्यवसायात फारशी सुधारणा झाली नाही. अखेर त्याने कुडूवाडी पोलीस ठाणे गाठून भोसले याच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानंतर मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांना ताब्यात घेऊन कुडूवाडी पोलीसांनी बेड्या ठोकल्या.
अकोला जिल्ह्यात पारा ४६.९ अंश सेल्सिअसवर
नागपूर: संपूर्ण विदर्भात उष्णतेने कहर केला असून उष्णतेची तीव्र लाट पसरली आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक, ४६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
अमरावती ४६.५ अंश सेल्सिअस ,भंडारा ४४.०अंश सेल्सिअस ,बुलडाणा ४३.५अंश सेल्सिअस अशी परिस्थिती आहे.
ब्रह्मपूर मध्ये ४४.२अंश सेल्सिअस
चंद्रपूर ४५.० अंश सेल्सिअस ,गडचिरोली ४४.५ अंश सेल्सिअस , गोंदिया ४४.४अंश सेल्सिअस नागपूर ४५.४ अंश सेल्सिअस आणि वर्धा जिल्ह्यात ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
यवतमाळ मध्ये ४६ अंश सेल्सिअस तर वाशिम मध्ये ४६.४ तापमान नोंदले गेले. यवतमाळ मध्ये ४६.० अंश सेल्सिअस तापमान होते.
मुंबईत दरमहा २००० हप्ता मागून रिक्षाचालकाकडून १,७०० रुपये स्विकारताना पोलिसाला पकडले
मुंबई: लाचखोर पोलीस शिपाई सतिश गणेश राठोड (क्र. १४१०५३ नेमणूक - घाटकोपर वाहतूक विभाग) याला लाचेची मागणी करुन १,७०० रुपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आयोजित सापळ्यात पकडण्यात आले.
तक्रारदार रिक्षा चालक असून ते घाटकोपर पश्चिम परिसरात करार करून भाडेतत्वावर रिक्षा चालवतात. ट्रॅफिक ऑफिस गांधी नगर, विक्रोळी पश्चिम येथील लोकसेवक पोलीस शिपाई सतिश राठोड यांनी रिक्षाचा धंदा चालू ठेवण्यासाठी व रिक्षावर चालान दंड न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे आठवडयाचा हफ्ता म्हणून १५०० ते २००० लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लोकसवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे समक्ष येवून तक्रार दिली.
करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान राठोड याने तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती १७०० रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान राठोड यास तक्रारदाराकडून लाचेची रक्कम १७०० स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
सतिश राठोड याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ कलम ७, अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
एलपीजीच्या भारतीय पुरवठादार देशांची संख्या वाढून १५
नवी दिल्ली: भारताची दैनंदिन एलपीजीची गरज अंदाजे ८०,००० टन इतकी आहे. दरम्यान, देशांतर्गत एलपीजी उत्पादनात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली असून, सध्या हे उत्पादन ४६,००० टनांच्या पातळीवर पोहोचले आहे. शिवाय, मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला उर्वरित गॅस आता विविध देशांकडून मिळवला जात आहे. यापूर्वी एलपीजीची आयात १० देशांतून केली जात असे, मात्र आता अशा पुरवठादार देशांची संख्या वाढून १५ झाली आहे.
आयातीचा हा विस्तार झाल्यामुळे, परिस्थितीमध्ये लक्षणीय बदल झाला आहे; कारण या संघर्षापूर्वी, भारत आपल्या एलपीजीच्या एकूण गरजेपैकी ९० टक्के गॅस विविध आखाती देशांकडून—ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) समावेश होता—मिळवत असे.
संघर्षाची परिस्थिती उद्भवण्यापूर्वी, भारताची ९० टक्के LPG ची गरज विविध आखाती देशांतून होणाऱ्या आयातीद्वारे पूर्ण केली जात असे; परंतु आता हे अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊन ते या नवीन स्रोतांकडे वळले आहे.
या आखाती देशांमध्ये संयुक्त अरब अमिराती (UAE), कतार, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन आणि ओमान यांचा समावेश होता. तथापि, LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि आयातीचे स्रोत वैविध्यपूर्ण करण्याच्या सरकारच्या 'प्लॅन बी' (Plan B) मुळे, आता बहुतांश खरेदी अमेरिका, नॉर्वे, कॅनडा, अल्जीरिया आणि रशिया यांसारख्या देशांतून केली जात आहे. अलीकडेच, सरकारने स्पष्ट केले की, एकूण सुमारे ८,००,००० टन LPG च्या मालवाहतूक खेपा (cargo shipments) आधीच निश्चित करण्यात आल्या असून, त्या सध्या वाटेवर आहेत
रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बॅंकचा परवाना रद्द केला
नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI), २४ एप्रिल २०२६ रोजीच्या आदेशान्वये, 'बँकिंग नियमन कायदा, १९४९' ('BR कायदा') च्या कलम २२(४) अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बॅंक लिमिटेडला देण्यात आलेला बँकिंग परवाना रद्द केला आहे.
हा आदेश २४ एप्रिल २०२६ रोजीच्या कामकाजाच्या समाप्तीपासून (business close) अंमलात येईल. परिणामी, पेटीएम पेमेंट्स बॅंकेला 'बँकिंग नियमन कायदा, १९४९' च्या कलम ५(b) मध्ये परिभाषित केल्यानुसार 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास, किंवा कलम ६ अंतर्गत नमूद केलेला कोणताही अतिरिक्त व्यवसाय करण्यास, तात्काळ प्रभावाने मनाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँक या बँकेच्या समापनासाठी (winding up) उच्च न्यायालयात अर्ज दाखल करेल. बँकेचे समापन झाल्यास, आपली संपूर्ण ठेव दायित्वे (deposit liability) परत करण्यासाठी पेटीएम पेमेंट्स बॅंकेकडे पुरेशी तरलता (liquidity) उपलब्ध आहे.
रिझर्व्ह बँकेने Paytm Payments Bank Limited चा परवाना खालील कारणांमुळे रद्द केला:
बँकेचे कामकाज अशा पद्धतीने चालवले जात होते, जे बँकेच्या आणि तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होते. अशा प्रकारे, बँक BR कायद्याच्या कलम २२(३)(b) चे पालन करत नाही.
बँकेच्या व्यवस्थापनाचे सर्वसाधारण स्वरूप हे ठेवीदारांच्या हितासाठी, तसेच जनहितासाठी प्रतिकूल आहे. अशा प्रकारे, बँक BR कायद्याच्या कलम २२(३)(c) च्या तरतुदींचे पालन करत नाहीये.
BR कायद्याच्या कलम २२(३)(e) मध्ये परिकल्पित केल्यानुसार, बँकेला कामकाज चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्यातून कोणताही उपयुक्त उद्देश किंवा जनहित साध्य होणार नाही.
बँकेला देण्यात आलेल्या 'पेमेंट्स बँक' परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली; ज्यामुळे BR कायद्याच्या कलम २२(३)(g) च्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे.
वादग्रस्त आमदार संजय गायकवाड विरोधात कोल्हापुरात पोलीस तक्रार
कोल्हापूर: शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या नावावरून अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड विरोधात खालील तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी विधी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन गुन्हा नोंदवितो, असे सांगितले आहे. गायकवाड एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार आहेत.
प्रशांत श्रीकांत आंबी ( रा. राजेंद्रनगर, नवीन वसाहत, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, जीभ कापण्याची व घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे याबाबत संजय गायकवाड या बुलढाणा येथील आमदार विरोधात फौजदारी तक्रार दिली आहे. ॲड. असीम सरोदे हे तक्रारदाराला सहकार्य करत आहेत.
आंबी अनेक वर्षे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक नाममात्र किंमतीत संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित करण्याचे काम करीत आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकात “शिवाजी कोण होता?” असा एकेरी उल्लेख का अशा कारणावरून बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना धमकी दिली आहे.
संजय गायकवाड यांचे प्रत्येक वाक्य कुणालाही राग येईल, मनाचा तोल बिघडेल आणि मानासिक परिणाम होईल असे तणाव निर्माण करणारे होते. त्यांच्या प्रत्येक वाक्यात शिवी, असंस्कृतपणा, स्त्री देहाचा अपमान करणारे घाणेरडे उच्चार इतकेच नाही तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी स्टेटमेंट्स आहेत. संजय गायकवाड हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत हे याआधीच्या अनेक घटनांवरून दिसते. त्यांनीच अत्यंत गर्वाने सांगितले की, मी कोण आहे ते गुगल, युट्युब इत्यादी समाज माध्यमांवर बघावे, असे तक्रारीत नमूद करुन आंबी यांनी म्हटले आहे की आमदार असणे म्हणजे आपण काहीही बोलू शकतो, कुणालाही धमक्या देऊ शकतो, कुणाच्याही आई-बहिणींची, बायकोची इज्जत काढू शकतो, कुणालाही मारू शकतो असे त्यांना वाटते.
आंबी यांनी म्हटले आहे की कोणतेही सभ्य संभाषण न करता केवळ शिवीगाळ, असभ्य भाषा असेच संजय गायकवाड करीत होते. तरीही मी त्यांना नम्रपणाने माझे म्हणणे सांगत होतो. दरम्यान मी त्यांना अनेकवेळा तुम्ही पुस्तक वाचा अशी सुद्धा विनंती केली, पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. वारंवार माझ्याकडून मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते फक्त शिवीगाळ करीत होते आणि धमक्या देत होते. कोल्हापुरात घरात घुसून तुला मारणार असे त्यांनी अनेकदा म्हटले. ते असंस्कृत, हिंसक लोकांच्या मदतीने माझ्या घरात घुसतील, दंगल घडवून आणतील, सामाजिक तेढ निर्माण करतील अशी साधार भीती मला व माझ्या कुटुंबियांना आहे. त्यांनी व त्यांच्या सोबतच्या गुंडानी आधी सुद्धा अनेकांना जीवावर बेतेल अशी मारहाण केलेली आहे त्यामुळे आमदार संजय गायकवाड वर गुन्हा नोंदवावा.
तत्कालीन पालिका आयुक्तांनी प्रशांत वाघमारेंना वाचविण्याचा प्रयत्न केला
सर्वोच्च न्यायालयाचेही निरिक्षण
नवी दिल्ली: महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी महानगरपालिकेचे तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या चौकशीला परवानगी नाकारून एक प्रकारे 'मिनी ट्रायल' चालवली आणि सार्वजनिक सेवकाला वाचविण्याचा प्रयत्न केला, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवत वाघमारे यांची याचिका फेटाळून लावली. उच्च न्यायालयाचा हाच निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
वाघमारे यांनी पदाचा गैरवापर करून २,००० कोटींची मालमत्ता जमा केल्याचा, तसेच भ्रष्टाचार करून हा पैसा पत्नी व भावाच्या नावावरील कंपन्यांमध्ये वळविल्याचा आरोप आहे. हे प्रकरण २०१६ मध्ये पहिल्यांदा समोर आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने २,००० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत हस्तक्षेप करण्यास नकार देत पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन शहर अभियंता प्रशांत वाघमारे त्यांची याचिका फेटाळून लावली. महापालिका तत्कालीन आयुक्तांनी २०१९ मध्ये वाघमारे यांच्याविरुद्धचा चौकशी करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवताना ताशेरे ओढले होते.
न्या. संजय कुमार आणि न्या, के, विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने वाघमारे यांची 'विशेष अनुमती याचिका' फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही सबळ कारण नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे वाघमारे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता वाघमारे यांच्या मालमत्तेची चौकशी करु शकतो.
महापालिका तत्कालीन आयुक्तांनी २०१९
मध्ये वाघमारे यांच्याविरुद्धचा चौकशी करण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवताना ताशेरे ओढले होते.
रंगमंच कलाकार बब्बन खान यांचे निधन
'अद्रक के पंजे'मुळे देशभरात प्रसिद्ध
मुंबई: हैदराबादचे सुप्रसिद्ध रंगमंच कलाकार आणि विनोदवीर बब्बन खान यांचे १७ एप्रिल २०२६ च्या रात्री निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यावर शनिवारी हैदराबाद येथील शांतीनगर दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शैला खान आणि दोन मुली असा परिवार आहे.
बब्बन खान हे त्यांच्या 'अद्रक के पंजे' या गाजलेल्या विनोदी नाटकासाठी विशेष ओळखले जात असत. हे नाटक १९६५ ते २००१ या काळात, म्हणजेच तीन दशकांहून अधिक काळ रंगमंचावर सादर केले गेले. १९८४ मध्ये, 'सर्वांत जास्त काळ चाललेला एकपात्री कलाकाराचा प्रयोग' (longest-running solo-artist show) म्हणून या नाटकाने 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले होते.
गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या निधनामुळे दख्खनी संस्कृती आणि रंगमंच या दोन्ही क्षेत्रांची मोठी हानी झाली असल्याचे मानले जात आहे.
'भाग्यलक्ष्मी प्रॉपर्टीज'चे भागीदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाचे अजामीनपात्र वॉरंट
कन्व्हेयन्स डीड करण्यास विलंब करणाऱ्या बिल्डर्सना दणका
पुणे: गृहरचना संस्थेच्या अभिहस्तांतरणाच्या अटींचे पालन न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील भाग्यलक्ष्मी प्रॉपर्टीज या विकासक कंपनीला मोठा दणका दिला.
बिल्डर ईश्वरचंद के. गोयल, विजयलक्ष्मी व्ही. अग्रवाल आणि मोहम्मदअली अस्लम हाजी या 'भाग्यलक्ष्मी प्रॉपर्टीज'चे भागीदारांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
हिंजवडीतील ‘एस्पिरिया’ प्रकल्पातील बहुतांश फ्लॅट्सची विक्री २०१२ मध्ये झाली होती. तरीही गृहरचना संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया २०१६ पर्यंत लांबली. त्यानंतरही विकासकाने मंजूर आराखड्यात बदलांसाठी फ्लॅटधारकांची संमती मिळवण्याचा आग्रह धरत प्रक्रिया अडकवून ठेवली. २०१७ मध्ये विकासकाने एकतर्फी ‘डीड ऑफ डिक्लेरेशन’ आणि ‘अपार्टमेंट डीड’ नोंदवून घेतल्याचे उघड झाल्यावर रहिवाशांना मोठा धक्का बसला होता.
सोसायटीची स्थापना केली गेली नाही, सोसायटीच्या नावाने डीम कन्व्हेन्स होऊ दिले नाही, सेवा सुविधा दिल्या नाहीत, त्यामुळे ग्राहकांनी उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. यासंदर्भात हिंजवडी मधील अस्परिया इमारतीमधील फ्लॅट धारक ग्राहकांनी गेली ११ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात हा लढा दिला होता. उच्च न्यायालयात वकील सत्या मुळे यांनी ग्राहकांच्या वतीने उत्तम बाजू मांडली.
खटला सुरू असताना दोघांचा समेट घडावा म्हणून पण प्रयत्न केले गेले आणि खटला परत घेतला गेला. तरीही त्याचा सन्मान बिल्डर नी केला नाही. आता केस मागे घेतली आहे तर प्लॅटधारक काही करू शकत नाहीत असे त्यांना वाटले. शेवटी परत ग्राहकांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असता न्यायालयात बिल्डर्स हजर झाले नाहीत.
त्यामुळे न्यायालयाच्या देखील लक्षात आले की बिल्डर्स न्यायालयाचा अवमान करत आहेत. त्यामुळे ईश्वरचंद के. गोयल, विजयलक्ष्मी व्ही. अग्रवाल आणि मोहम्मदअली अस्लम हाजी या 'भाग्यलक्ष्मी प्रॉपर्टीज'च्या भागीदारांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले.
बनावट एटीसी परवानग्यांचा महाघोटाळा
पुणे, दि.२० (प्रतिनिधी) - पुणे शहरात विमान अपघाताची टांगती तलवार ठेवून विकासक आणि महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी चक्क बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या जीवावर इमारतींचे जंगल उभे केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. देशाच्या सुरक्षेशी आणि पुणेकरांच्या जिवाशी खेळणाऱ्या गुन्हेगारांना जेलमध्ये टाका, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेने ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी निवेदन दिले आहे.
शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरात उंच इमारतींना दिलेल्या मंजुरीमध्ये मोठे गौडबंगाल आहे. एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेचे डोळे उघडताना स्पष्ट सांगितले की, आंबेगाव येथील प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी ही 'कंप्लिटली फेक' (पूर्णपणे बनावट) आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आले आहेत. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाही, पुणे महापालिका प्रशासन अशा गंभीर विषयावर कुंभकर्णी झोप घेत असल्याचे चित्र आहे.
चौकट
प्रशासनाचे घोटाळेबाजांना अभय?
या महाघोटाळ्याप्रकरणी ६ एप्रिल रोजीच पुरावे देऊनही महापालिका आयुक्त आणि मुख्य अभियंत्यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात आहेत, तर दुसरीकडे बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले जात आहेत. हा थेट राष्ट्रद्रोहाचा प्रकार आहे, अशा शब्दांत अनंत घरत यांनी आपला संताप व्यक्त केला.
मंत्री मोहोळ यांनी चौकशी करावी
खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या उंच इमारतींना प्रशासनाने तात्काळ टाळे ठोकावे आणि दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा पुण्याच्या रस्त्यावर शिवसैनिक उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशाराही घरत यांनी दिला.
टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक
भ्रष्टाचारमुक्तीसाठी मूक जन आंदोलन
पुणे: शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात येणारी विकास कामे अधिकारी व नगरसेवकांच्या संगनमताने अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. निकृष्ट कामाची बीले काढण्यासाठी ठेकेदारांना लाखो रुपयांच्या खंडणीची, टक्केवारी आजी, माजी नगरसेवकांना द्यावी लागत आहे.
बाणेर येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या तीन कोटी रुपयांच्या बीलाच्या टक्केवारी वरुन सत्ताधारी भाजपच्या आजी आणि माजी नगरसेविकांत जोरदार भांडणे झाली. हाणामारी पर्यंत गेलेल्या या घटनेने पालिकेच्या विकास कामात कामांच्या उत्तम दर्जा पेक्षा टक्केवारी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा उघडकीस आले आहे.
टक्केवारीचे कुरण बनलेल्या पुणे पालिकेच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून टक्केवारीला पायबंद घालण्यासाठी पालिका भवनात भ्रष्टाचार मुक्त जन आंदोलन सुरू करण्याचा निर्धार आम आदमी पार्टीने केला आहे.
या बाबत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर आणि सुदर्शन जगदाळे व पदाधिकारी यांनी पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे.
आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, ''समाजसुधारक
महात्मा फुले यांनी ब्रिटिश राजवटीत पालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यसेनानी गणपतराव नलावडे,जेष्ठ विचारवंत एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, नानासाहेब पुरुळेकर, बाबुराव सणस,नामदेवराव मते भाई वैद्य आदींच्या निस्वार्थी व त्यागी नेतृत्वामुळे पुण्याच्या वैभवात भर पडली.
याचा विसर अलिकडच्या काळात पालिकेच्या सत्ताधाऱ्यांना पडत चालला आहे. पालिकेच्या मुख्यालयातच भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे व विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांचे कामाच्या टक्केवारीवरुन काल बुधवारी जोरदार भांडण झाले.शहर व जनतेच्या विकासा पेक्षा स्वतः ला टक्केवारी मिळावी यासाठी आजी माजी नगरसेविका अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भांडण करतात यामुळे पुणेकरांच्या विश्वासाला तडा गेला आहे. या घटनेचा आम आदमी पार्टी व पुणेकरांच्या वतीने तीव्र निषेध करतो.''
या कथित टक्केवारी
प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर यावे, ताबडतोब चौकशी समिती स्थापन करावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.
या प्रकराची प्रशासनासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसांत तात्काळ दखल घ्यावी. विषय प्रचंड गंभीर आहे. पुणेकरांच्या पैशांवर टक्केवारीची राजकारण आम्ही सहन करणार नाही,असे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले.
मुकुंद किर्दत सुभाष कारंडे,निरंजन अडागळे,सतीश यादव, निलेश वांजळे, आरती कारंजवाने, सुरेखा भोसले, सुनीता काळे, सुनील सौदी, थोरात कुमार धोंगडे, इब्राहिम शेख, कुणाल घारे,इकबाल तांबोळी, शेखर ढगे, सुरज सोनवणे,गणेश थरकुडे, उमेश बागडे रुपेश, शिवाजी डोलारे, संजय कटारनवरे, मिलिंद सरोदे,संतोष काळे, गजानन भोसले, डिकरा शेख, उमेश दीक्षित आदी उपस्थित होते.










