News Portal

जागतिक महिला दिनानिमित्त शिवाजीनगर न्यायालयात स्नेहसंमेलन उत्साहात

पुणे: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुणे बार असोसिएशनतर्फे सोमवारी शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयातील अशोका हॉल येथे विविध उपक्रम आणि स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शक्तीचा जागर आणि महिला वकिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान या कार्यक्रमाद्वारे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी होत्या, तर मुख्य व्याख्यात्या म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती शालिनी फणसळकर-जोशी उपस्थित होत्या.

दिवसाची सुरुवात महिला वकिलांसाठी आयोजित आरोग्य शिबिराने झाली, ज्यामध्ये अनेक वकिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. त्यानंतर आयोजित 'काव्यरंग' या उपक्रमात महिला वकिलांनी आपल्या स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

 पुणे बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड.  राम भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शालिनी फणसळकर-जोशी यांनी कायदेशीर क्षेत्रातील महिलांचे योगदान आणि आव्हाने या वर मार्गदर्शन केले. मृणाल कुलकर्णी यांनी स्त्रीत्वाचा सन्मान आणि सामाजिक जाणीवेवर भाष्य केले.

 पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. प्रताप मोरे, ॲड. प्रीतीसींग परदेशी, सचिव ॲड. सम्राट जांभूळकर, ॲड. अभिजित पोळ, ऑडिटर ॲड. शिवराज निंबाळकर,खजिंदार अंजली बांदल आणि कार्यकारिणी सदस्य ॲड. योगेश जैन ॲड. प्रितेश दळवी आदी व्यासपीठावर होते.

ॲड.प्रियंका घाडगे व ॲड.स्मिता वाघमारे यांनी प्रमुख उपस्थित पाहुणे यांची ओळख करुन दिली. सूत्रसंचालन ॲड .नेहा जांभळे व ॲड.गुंजन भोसले यांनी केले. आभार ॲड.पूजा पवार व ॲड.शीतल देशमुख यांनी मानले.

सामाजिक कृतज्ञता निधी सामाजिक कार्यासाठी ९० सामाजिक संस्थांना ३९ लाखांचा निधी समर्पण




पुणे : शिक्षण नसल्याने नक्षलवाद फोफावला असे प्रतिपादन मध्यप्रदेश येथील सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदालयच्या भारती ठाकूर यांनी केले.भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज वेल्फेअर ऑर्गनायझेशन द्वारा आयोजित नवी पेठ येथील निवारा सभागृहात सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून भारती ठाकूर बोलत होत्या. नव्वद संस्थांना यावेळी ३९ लाखांचा  निधी समर्पण करण्यात आला.

त्या म्हणाल्या "आमच्या शाळांतून व्यवसायाभिमुख शिक्षण दिले जाते आणि आमचा अभ्यासक्रम आम्हीच बनवला असून गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिले जाते.पाठांतरावर भर दिला जातो.''

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधु सक्सेना ह्यांनी यावेळी आपले विचार मांडले. ते असे म्हणाले," बँक ऑफ महाराष्ट्रने प्रगतीचा खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि बँक येत्या दोन ते तीन वर्षांत अजून प्रगतीची वरची श्रेणी मिळवायचा प्रयत्न करीत आहे."
सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्यांची "बोमरेओ" संघटना करीत असलेल्या कार्याची प्रेरणा घेऊन बँक देखील सामाजिक जबाबदारी म्हणूनअसे उपक्रम करायचा विचार करत आहे"

या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक  बाळासाहेब फडणवीस,नारायण अचलेरकर,मोहन घोळवे, भास्कर माणकेश्वर,डॉ सुनील देशपांडे,ह्यांची मुख्य उपस्थिती होती. प्रारंभी भारती ठाकूर यांचा परिचय सुलभा कुलकर्णी ह्यांनी तर बँकेचे कार्यकारी संचालक व व्यवस्थापकीय संचालक निधु सक्सेना यांचा परिचय डॉ सुनील देशपांडे ह्यांनी  करून दिला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजातील उपेक्षित,दिव्यांग,गतिमंद,कृषी,आरोग्य,क्रीडा,पर्यावरण,गो-सेवा,शैक्षणिक आदि सामाजिक सेवा क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना ह्या संघटनेच्या सदस्यांनी स्वतः निधी गोळा करून आत्तापर्यंत तीन कोटी रुपयांची मदत केली असल्याचे महासचिव नारायण अचलेरकर ह्यांनी ह्यावेळी सांगितले.पद्मश्री डॉ सुनीता गोडबोले यांच्या बस्तर येथील वनवासी बांधवांसाठी केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दल व केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
ह्याप्रसंगी रौप्यमहोत्सवी स्मरणिका साठी विशेष योगदान देणाऱ्या डॉ चंद्रशेखर बारगजे,माधव लेले व मधुसूदन निमकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमास संपूर्ण भारतातून बँक ऑफ महाराष्ट्रचे निवृत्त उच्चपदस्थ,कर्मचारी,अधिकारी,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च; तरीही नाले मैलापाण्याने तुडुंब

'आपले पुणे आपला परिसर' ची तक्रार 

पुणे: अकरा गावांसाठी ११५ कोटी रुपये खर्च करूनही ड्रेनेजची समस्या या गावांच्या मध्ये असेल आणि नाले मैलापाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत तर नेमके काम काय झाले याची तपासणी होणे आवश्यक आहे, अशी मागणी 'आपले पुणे आपला परिसर' स्वयंसेवी संस्थेने स्थायी समितीकडे केली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर , सुहास कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत बधे हे या संस्थेचे पदाधिकारी आहेत‌.

प्रशासकराज मध्ये मलनि:सारण ५७१.९५ कोटी आणि मलनिःसारण प्रकल्प ५७४ कोटी असे ११४५.९५ कोटी खर्च झाले असे आकडे आहेत. याबाबत प्रशासनाकडून
सविस्तर माहिती घ्यावी. आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केलेल्या अंदाजपत्रकातील आकडे तपासताना ही बाब लक्षात आली, असे संबंधित निवेदनात म्हटले आहे.

केसकर यांनी सांगितले की आपण जर पाहिले तर सर्व नाल्यांमधून नदीकडे ड्रेनेजचे पाणी जाताना दिसते, याचा अर्थ ड्रेनेज लाईनचे नेटवर्क नीट जोडले गेले आहे का नाही याची देखील विचारणा करावी. 
सल्लागारांनी तयार केलेला सविस्तर अहवाल, टेंडरची कॉपी, प्रत्यक्ष जागेवर झालेले काम अधिकाऱ्यांनी तपासून तयार केलेली बिले ही एकदा नीट तपासणी करणे आवश्यक आहे. 
एक-दोन कंत्राटदार आणि वर्षानुवर्ष त्या खात्यामध्ये बसलेले अधिकारी यांच्या संगनमताने हे होत नाही ना हे देखील तपासले पाहिजे.

 कंत्राटदाराच्या ईनोव्हा कारचे गूढ

ड्रेनेज प्रकल्प विभागाने ड्रेनेजचा मास्टर प्लॅन हा ११ गावे अधिक २३ गावे नंतर समाविष्ट झालेले तयार करून टेंडर काढले होते. 
तसेच जे अधिकारी ११ गावांना काम बघत होते त्यांना बोगस कामे केल्यामुळे २३ गावातील प्रकल्पातून वगळण्यात यावे.मलनि:सारण या खात्याच्या एका कार्यकारी अभियंता कडे आणि एका उपअभियंता सारख्या अधिकार्‍यांच्याकडे प्रकल्पाच्या नावाखाली अधिकृत कंत्राटदाराच्या ईनोव्हा कार आहेत त्याबाबत देखील माहिती घ्यावी. तसेच 'एसडी'ची कामे कधी पूर्ण होणार की आयुष्यभर चालूच राहणार आहे याचाही अहवाल मागविणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेत शिवसेना

 गटनेतेपदी सुवर्ण दरेकर

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या गटनेतेपदी पदाची धुरा महिलेकडे दिली असून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पेठ गटामधून निवडून आलेल्या सुवर्णा देविदास दरेकर यांची गटनेता  निवड करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य असून त्यांच्या गटाची नोंदणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

गटनेता म्हणून सुवर्णा दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, देविदास दरेकर, रमेश कोंडे त्याचबरोबर सदस्य मंगेश काकडे, रूपाली कोंडे, स्मिता कणसे, नेहा पाटील, सुवर्ण दरेकर हे शिवसेनेचे पाचही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.


 सुवर्णा दरेकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील योजना आणि कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. सभागृहातील आणि प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता यावी, योजना राबवताना कुठेही अनुशेष अथवा विशिष्ट विभागावर अन्याय होणार नाही. यावर देखील आम्ही लक्ष ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न करू.

धायरीत परांजपे बिल्डरला दणका

 माहिती अधिकारातून कारवाई

पुणे : धायरी येथील अभिरुची परांजपे स्कीम परिसरातील म्हाडाच्या सोसायट्यांमधील मैला मिश्रित सांडपाणी एसटीपी प्लांटमध्ये प्रक्रिया न करता जवळील सोसायटी परिसरात सोडले जात असल्याची बाब समोर आली. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला होता.या संदर्भात दक्ष नागरिक मंच यांनी पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांकडे दिनांक १० सप्टेंबर २५ रोजी लेखी तक्रार केली होती.


तक्रारीवर कार्यवाही करण्यात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंचाचे समन्वयक सुरेश भाले यांनी २ फेब्रुवारी २६ रोजी जनमाहिती अधिकारी, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला.या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक २ मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटीपी प्लांट अद्याप सोसायट्यांना हस्तांतरित करण्यात आलेला नसून त्याची देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी अभिरुची परांजपे स्कीमच्या व्यवस्थापनाकडेच आहे, असे समजले.

सोसायट्यांमधील मैला मिश्रित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता बाहेर सोडून आरोग्यास घातक परिस्थिती निर्माण केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेने संबंधित व्यवस्थापनास १ लाख दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. 

दंड न भरल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कलम चॅप्टर १४ नियम ३ (फ) नुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी नोटीसही बजावण्यात आली आहे.दरम्यान, ज्या सोसायट्यांतील सदस्यांनी तक्रार केली होती त्यांच्याकडे चौकशी केली असता अद्यापही समस्येचे पूर्ण निराकरण झालेले नसल्याचे समोर आले आहे.

भोर आणि हवेली पंचायतीवर राष्ट्रवादीचे सभापती

भोर मध्ये चिठ्ठी बाजूने तर हवेलीत अपक्षाचा पाठिंबा 

पुणे: भोर आणि हवेली तालुक्यातील पंचायत समिती सभापती पदाची निवड सोमवारी झाली. हवेलीत अपक्षाच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली तर भोर मध्ये बहुमत नसतानाही चिठ्ठी बाजूने पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती झाला

भोर पंचायत समितीमध्ये मनिषा कंक सभापती पदी तर विशाल कोंडे उप सभापती झाले. संख्याबळ ४-४ असे बरोबरीत असल्याने, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ही निवडणूक 'चिठ्ठीवर' निश्चित करण्यात आली होती. चिठ्ठीद्वारे नशीब आजमावण्यात आले. नशिबाने साथ राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. 

भोर नगरपालिका अध्यक्षपदानंतर आता पंचायत समितीचे अध्यक्षपद देखील हातातून गेल्याने माजी आमदार संग्राम थोपटेंना धक्का बसला. तर आमदार शंकर मांडेकर यांना नशिबाची साथ मिळाली.

हवेली पंचायत समितीच्या सभापतीपदी युवराज हिरामण काकडे तर उपसभापतीपदी अपक्ष सदस्य विद्या दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. 

हवेली पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी ७ सदस्यांचे संख्याबळ आवश्यक होते.  निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी केवळ एक जागेचा पेच राष्ट्रवादी काँग्रेससमोर होता. अपक्षाच्या पाठिंब्यामुळे सत्ता येत असल्याचे दिसताच बैठका सुरु होऊन विद्या गायकवाड यांना उपसभापतीपद देण्याचे ठरले.

पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी युवराज काकडे तर उपसभापती पदासाठी विद्या गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल आला होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

उदय लेले यांना दुसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवकपद

माजी महापौर दत्ता धनकवडे सुध्दा सभागृहात 
पुणे: महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी जोरदार स्पर्धा असून आतापर्यंत सुमारे ८०० हून अधिक अर्ज आयुक्तांकडे प्राप्त झाले आहेत. सत्ताधारी भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल ४०० जणा इच्छुक असून त्यापैकी ७ जणांची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.


भाजपचे नीलेश कोंढाळकर, प्रियंका शेंडगे, विश्वास ननावरे, राजेंद्र काकडे, रवि साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि उदय लेले यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड निश्चित होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे तसेच राकेश कामठे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड निश्चित केली आहे. यापैकी पालिका निवडणुकीतून डावलण्यात आलेले उदय लेले यांना दुसऱ्यांदा स्वीकृत नगरसेवक पद मिळाले आहे. दत्ता धनकवडे यांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झाला होता.

 चारशे जणांतून सात नाव निवडण्याचे मोठे आव्हान स्थानिक नेत्यांवर होते, त्यानुसार नावे निश्चित करण्यात आली आणि प्रदेश भाजपकडे पाठवण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांना मंजुरी देऊन सभागृह नेते गणेश बिडकर यांना संबंधितांची नावे पाठवली आहेत.

स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याचे अधिकार आयुक्तांना असतात. त्यामुळे अनेक इच्छुकांनी थेट महापालिका आयुक्तांकडे अर्ज सादर केले आहेत. आतापर्यंत सुमारे ८०० हून अधिक अर्ज आयुक्तांकडे प्राप्त झाल्याने अर्जाची छाननी करण्यासाठी निवडणूक विभागाने चार सदस्यांची समिती नियुक्त केली आहे.

भारताने इतिहास घडवला

 भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या


भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या

पुणे: रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या सहा विकेट्स घेवून भारत आघाडीवर असल्याने पुणेकरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली. सामना जिंकल्यावर फटाक्यांची दिवाळी साजरी करण्यात आली.

संपूर्ण शहरात सायंकाळी अत्यंत तुरळक रहदारी होती. अनेक ठिकाणी पडद्यावर सामन्याचे प्रक्षेपण केले जात होते. रात्री विजय दृष्टीपथात येताच एकच जल्लोष सुरू झाला.

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड १५ षटकांनंतर १३९/६ असा संघर्ष करत होता. कर्णधार मिशेल सँटनर आणि जेम्स नीशम क्रीजवर होते. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आहेत, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

 यापूर्वी, भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात २० षटकांत २५५/५ असा मोठा विक्रम नोंदवला होता. संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, ज्यामुळे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली. अभिषेक शर्माने शेवटपर्यंत आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले आणि केवळ १८ चेंडूत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. इशान किशन (२५ चेंडूत ५४ धावा) आणि शिवम दुबे (८ चेंडूत २६ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे, तो तीनदा जिंकण्याचे आणि घरच्या मैदानावर जिंकण्याचे लक्ष्य ठेवत होता. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी उत्सुक होता. अखेर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला.

भारत इतिहासाच्या उंबरठ्यावर

भारत विरुद्ध न्यूझीलंड विश्वचषक अंतिम सामना: जसप्रीत बुमराहने २ चेंडूत २ विकेट घेतल्या

 


 


पुणे: रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या सहा विकेट्स घेवून भारत आघाडीवर असल्याने पुणेकरांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी सुरू केली.

संपूर्ण शहरात सायंकाळी अत्यंत तुरळक रहदारी होती. अनेक ठिकाणी पडद्यावर सामन्याचे प्रक्षेपण केले जात होते. रात्री विजय दृष्टीपथात येताच एकच जल्लोष सुरू झाला.

२५६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, न्यूझीलंड १५ षटकांनंतर १३९/६ असा संघर्ष करत होता. कर्णधार मिशेल सँटनर आणि जेम्स नीशम क्रीजवर होते. अक्षर पटेलने दोन बळी घेतले आहेत, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक बळी घेतला आहे.

 यापूर्वी, भारताने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात २० षटकांत २५५/५ असा मोठा विक्रम नोंदवला होता. संजू सॅमसनने सर्वाधिक ८९ धावा केल्या होत्या, ज्यामुळे टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात फलंदाजाने सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या केली. अभिषेक शर्माने शेवटपर्यंत आपले सर्वोत्तम प्रदर्शन वाचवले आणि केवळ १८ चेंडूत स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक झळकावले. इशान किशन (२५ चेंडूत ५४ धावा) आणि शिवम दुबे (८ चेंडूत २६ धावा) यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारत टी२० विश्वचषक विजेतेपद राखणारा पहिला संघ बनण्याचे, तो तीनदा जिंकण्याचे आणि घरच्या मैदानावर जिंकण्याचे लक्ष्य ठेवत आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड त्यांच्या पहिल्या टी२० विश्वचषक विजेतेपदासाठी उत्सुक आहे.

महापालिका भवनाजवळच अनेक वर्षांपासून भर चौकात अतिक्रमण

दुर्लक्षाचा फायदा घेऊन पत्रा शेड मध्ये अनेकांना निवारा 


 


पुणे: अतिक्रमणे हटवण्याबाबत भीम गर्जना करणाऱ्या महानगरपालिकेच्या अगदी जवळच भर चौकात शेडवजा अतिक्रमण झाले असून रस्ता वाहतूक पोलिसांच्या बॅरिकडने अडवून पत्र्याची खोली बांधण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून तेथे परप्रांतीयांचे वास्तव्य आहे. 

महानगरपालिका भवनापासून जुन्या तोफखान्याकडे जाणाऱ्या चौकातली ही परिस्थिती आहे. भर चौकात एका मंडळाचे पक्के बांधकाम असलेले देऊळ आहे. त्याच्या भिंतीचा आडोसा घेऊन लोखंडी बॅरिकेड्सनी ५ ते ६ फूट रुंदीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. खेटून असलेल्या ताडी अड्ड्याच्या पत्र्याच्या आडोशाने चारही बाजूंनी पत्रे उभारुन एक मोठी खोली उभारण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. 

संबंधित मंडळाने घेतलेल्या नळावर चोवीस तास पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. समोरच नदीपात्रालगत सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. पीएमपीएमएलचे मोठे स्थानक तेथे आहे. त्यामुळे महापालिका भवनाच्या नाकाजवळ बेकायदेशीर खोली बांधणाऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध असल्याने त्यांचे फावले आहे. 

दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार, शहरातील अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. मात्र, बांधकामांवर कारवाई करताना  अनेकांची घरे पाडली जात आहेत. अगदी चार ते पाच मजल्याच्या इमारती पाडल्या जात आहेत. तथापि महापालिकेच्या नाकावर टिच्चून अनेक वर्षांपासून असलेली अशी अतिक्रमणे 'जैसे थे' असल्याने सार्वजनिक रस्ता अडवला जात आहे. तसेच वाहतूक पोलिसांच्या लोखंडी बॅरिकेड्सचाही अडथळा अतिक्रमणासाठी उपयोगी आणला जात आहे. वाहतूक पोलिसांकडील बॅरिकेड्सची संख्या आणि इतस्ततः पडलेले बॅरिकेड्स हा स्वतंत्र विषय आहे.

महाराष्ट्र शासन आता 'चेअरमन' उद्योगातही!




पुणे: महाराष्ट्र शासन आता 'चेअरमन' उद्योग या नावानेही कारागिरांचा विकास करत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने हा नवीन उपक्रम सुरू झाल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या बसवरील अर्थात 'एसटी'वरील एका जाहिरातीवरून दिसून आले. 

राज्य पातळीवरून जिल्हा किंवा शहर पातळीवर पदांची खैरात शासनातर्फे केली जाते त्यामध्ये चेअरमन अर्थात अध्यक्ष पदाला प्रचंड महत्व आले आहे. अशा परिस्थितीमध्ये खुद्द शासनाची 'चेअरमन उद्योग' अशी जाहिरात पुढे आल्याने राजकीय इच्छुकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

वास्तव काय आहे?

काही काळापूर्वी विडंबनात्मक अथवा उपहासात्मक बातम्या किंवा लेख वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असत. तसाच प्रकार याही बातमीच्या मजकुराबाबत आहे. वास्तवामध्ये एस.टी. वर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 'अनुसुचित जाती मधील चर्म उद्योगातील कारागिरांचा विकास ' या ऐवजी 'अनुसुचित जाती मधील चेअरमन उद्योगातील कारागिरांचा विकास' अशी चूक झाली आहे. 


एसटी महामंडळाच्या बस संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतात. अशा परिस्थितीत किती बसगाड्यांच्या माध्यमातून असा चुकीचा मजकूर प्रसारित होत आहे, हे समजण्यास मार्ग नाही. नुकत्याच साजऱ्या झालेल्या मराठी दिनाचा पार्श्वभूमीवर शासनाच्या जाहिराती अर्थाचा अनर्थ करणाऱ्या असतात, हे या उदाहरणावरून दिसून आले.

या जाहिरातींवर किती लाख रुपये खर्च झाला आहे? या जाहिरातीचा मजकूर कोणी तपासला आणि अंतिम केला? या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत महाराष्ट्राला 'चेअरमन' उद्योग सहन करावा लागणार आहे हे नक्की!


लोकशाही टिकवण्यासाठी काॅंग्रेस कार्यकर्ते निवडणुकांना सामोरे

जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील यांचे वक्तव्य 

 

 

पुणे: मावळ व  मुळशी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील नागरी समस्या व प्रश्न हातात घेऊन पक्ष संघटनेला संजीवनी प्राप्त करून देण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

 कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील, जेष्ठ नेते कमलाकर सातव, प्रदेश प्रतिनिधी आकाश मोरे, शंकरराव दांगट, संदीप नायकरे, चंद्रकांत गोरे, संजय अभंग ,आनंद पवार, मावळ  तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, कार्याध्यक्ष गोपाळ तंतरपाळे, संपर्क प्रमुख राजू शिंदे, उपाध्यक्ष राजीव फलके, मुळशी तालुकाध्यक्ष सुरेश पारखी, उपाध्यक्ष सतीश चांदेरे, अशोक मातेरे, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते.

धनशक्ती विरुद्ध जनशक्तीच्या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार लोकशाही टिकवण्यासाठी या निवडणुकीत सामोरे गेले. अशा प्रतिकूल परिस्थितीत लढलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष सदैव पाठीशी राहील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला.

महाराष्ट्रावर ९,३२,२४२ कोटी कर्जाचा बोजा

मुंबई: २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात महाराष्ट्राचे सार्वजनिक कर्ज ९.३२ लाख कोटींपर्यंत वाढेल, जे मागील वर्षीच्या ८.३९ लाख कोटींपेक्षा १८.३ टक्क्यांनी वाढले आहे.


गुरुवारी विधानसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात ही आकडेवारी उघड झाली.
तथापि, कर्ज असूनही, राज्याचा आर्थिक विकास दर ७.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे.

भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. कर्जाचा बोजा असूनही, महाराष्ट्र देशातील सर्वात मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. कर्जाची रक्कम ९,३२,२४२ कोटी (अर्थसंकल्पीय अंदाज) आहे, तर व्याज देय ६४,६५९ कोटी आहे.

सीआयडीकडून 'व्हीएसआर व्हेंचर्स'चा मालक व्ही.के. सिंग याची चौकशी

मुंबई: महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी व्हीएसआर व्हेंचर्सचे मालक व्हीके सिंग यांची चौकशी केली. ही कंपनी २८ जानेवारी रोजी बारामती येथे ज्यांचे विमान कोसळले होते, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला होता. सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सिंग यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, तपासाचा मुख्य उद्देश हा अपघात कट रचण्याचा होता की गुन्हेगारी निष्काळजीपणाचा. विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) च्या प्राथमिक अहवालात दृश्यमानता कमी असणे आणि धावपट्टीची जीर्ण स्थिती हे अपघाताचे कारण असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान, राजकीय वादही तापला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (सपा) आमदार रोहित पवार यांनी आरोप केला आहे की कोणीतरी व्हीएसआर व्हेंचर्सचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.

तुकाराम बीज निमित्ताने देहुमध्ये भाविकांची रिघ


देहूरोड: संत तुकाराम महाराज बीजे निमित्ताने पालखीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची देहुगावात रिघ लागली होती. दुपारी १२ च्या सुमारास पालखी मंदिरातून वैकुंठाकडे पादुका असलेली पालखी नेण्यात आली. त्यावेळी फुलांचा वर्षाव करत भाविकांनी दर्शन घेतले.

संत तुकाराम बीज म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या 'सदेह वैकुंठगमनाचा' पवित्र स्मृती दिन होय हा दिवस फाल्गुन वद्य द्वितीयेला (फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया) देहू (पुणे) येथे मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. वारकरी संप्रदायात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

भारताची अर्थनीती ‘थोडी आगळी , पण जगावेगळी’

उद्योजक राम भोगले यांचे वक्तव्य 


पुणे : "अर्थनीती म्हणजे निव्वळ पैशांचं व्यवस्थापन नाही.तर ते देशाचे सर्वांगीण धोरण असते. म्हणूनच शिक्षण,संरक्षण,उद्योग,व्यापार व कृषी अशा सर्वच गोष्टींचा त्यात समावेश असतो.गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सर्व क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आणि अर्थनीतीला नवे आयाम जोडले. त्यामुळेच भारताची अर्थनीती ‘थोडी आगळी , पण जगावेगळी’ ठरली"असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक राम भोगले यांनी रविवारी येथे केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहकारनगर येथील अरण्येश्वर प्रभात शाखा आणि विद्या विकास विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'शिक्षण महर्षी  लक्ष्मीकांत जांभोरकर स्मृति व्याख्यानमाले'त ते बोलत होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  पद्मावतीनगर संघचालक अविनाश धोमकर आणि विद्या विकास प्रशालेचे अध्यक्ष विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त) यावेळी व्यासपीठावर होते. 

‘भारताची अर्थनीती-थोडी आगळी,जगावेगळी’ या विषयाच्या अनुषंगाने राम भोगले यांनी गेल्या दहा वर्षात भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बदललेल्या अर्थनीतीमुळेच भारताला ही झेप घेता आली असे ते म्हणाले. 
मोदी राजवटीपूर्वी आणि विशेषतः स्वातंत्र्यानंतर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्यावर सरकारचा भर होता.यामुळे मागणी वाढली,पण देशांतर्गत उत्पादन कमी असल्याने त्याचा फायदा चीन,अमेरिका या देशांनी घेतला.पंतप्रधान मोदीनी मात्र उत्पादनवाढीवर भर दिला. ‘उत्पादन वाढवा व आपल्या वस्तू परदेशात विका’ हे त्यांचे सूत्र आहे. त्यांनी अनेक उद्योग खासगी क्षेत्रांसाठी खुले केले. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील उत्पादनेही भारत फोर्ज सारख्या कारखान्यात व्हायला लागली.मोबाईलच्या क्षेत्रात भारत जगात अग्रेसर ठरला. 
सरकारच्या गोदामात साठलेले धान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब जनतेला मोफत दिले पण त्याचवेळी शेतक-यांचे धान्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करून शेतीविकासालाही वाव दिला. कर्ज धोरणात सुधारणा करुन बॅंका बळकट केल्या आणि 'मेक इन इंडिया' सारख्या योजना राबवून उद्योगांसाठी नवी क्षितीजे खुली केली. 

या नव्या अर्थनीतीमुळे करोनाच्या संकटानंतर जगातल्या अनेक राष्ट्रांची आर्थिक स्थिती डबघाईला आलेली असतांना भारतीय अर्थव्यवस्था मात्र प्रगतीकडे झेप घेत आहे" असे राम भोगले म्हणाले. 

प्रारंभी डॉ शरद कुंटे यांनी प्रस्ताविकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षातील भूमिका मांडली.सुधीर मोघे यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. भूषण करमरकर यांनी सूत्रसंचालन केले. 

यावेळी यजुर्वेद कंठस्थ घनपारायण पूर्ण केल्याबद्दल  सहकारनगरमधील वेदमूर्ती  ऋतूश मंगेश याळगी यांचा उद्योजक राम भोगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे आर्थिक विषयाला अनुसरुन सुरुवातीला श्रीसुक्ताचे गायन  करण्यात आले.मीनल गानू यांनी श्रीसुक्ताचे गायन केले तर सोनाली निबंधे यांनी श्लोकांच्या अर्थाचे वाचन केले.गौरी कुलकर्णी यांनी आभार मानले. असिमा मुजुमदार यांच्या संपूर्ण वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

जातमुक्त संकल्पनेतून सौंदाळा गावात अनोखी होळी; ‘वाईट प्रवृत्तींचे दहन’ करून दिला ऐक्याचा संदेश

अहिल्यादेवी नगर : अहिल्यादेवी नगरच्या सौंदाळा गावात यंदाची होळी पारंपरिक पद्धतीने न साजरी करता सामाजिक ऐक्य आणि समतेचा संदेश देत अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली. गावकऱ्यांनी एकत्र येत जातमुक्त गावाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन केले.

होळीपूर्वी ग्रामपंचायत परिसरात सर्व समाजबांधवांची बैठक घेण्यात आली. “आपण सर्व एकच गावकरी, एकच कुटुंब” हा संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर गावातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने कागदावर आपापल्या त्याग करावयाच्या वाईट गोष्टी लिहिल्या.
या कागदावर ‘जातभेद’, ‘अस्पृश्यता’, ‘उच्च-नीच भावना’, ‘अहंकार’, ‘मत्सर’, ‘दारूचे व्यसन’, ‘अंधश्रद्धा’, ‘घरगुती हिंसा’, ‘भांडणे’ वाईट सवयी,मी....जातीचा,स्वार्थीपणाचे दहन,अन्यायाचे दहन अशा विविध नकारात्मक प्रवृत्तींचा उल्लेख करण्यात आला. सर्वांनी एकत्रितपणे हे कागद होळीत टाकून वाईट प्रवृत्तींचे प्रतीकात्मक दहन केले.
यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी समतेची शपथ घेतली. “जातमुक्त सौंदाळा – एकीचे बळ आमुचे खरे बळ”अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. कार्यक्रमात युवक मंडळ,महिला बचत गट,ग्रामपंचायत सदस्यांचा सक्रिय सहभाग होता.

होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे करताना रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक रंगांचा वापर करण्याचे,तसेच पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन करण्यात आले. काही युवकांनी गाव स्वच्छता मोहीमही राबवली.

या उपक्रमामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.या वेळी सरपंच शरद आरगडे भिवसेन गरड,गणेश आरगडे,सचिन आरगडे,बाबासाहेब आरगडे,बाबासाहेब बोधक, रामकीसन आरगडे,बाळासाहेब बोधक,लक्ष्मण आरगडे,प्रियंका आरगडे,ज्योती बोधक,आशाबाई आरगडे, स्वाती आरगडे संगीता बोधक मंगल बोधक रंजना आढागळे, कावेरी आढागळे,रुकसाना सय्यद आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सौंदाळा गावाची ही अनोखी होळी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

साने गुरुजी मंडळाजवळील गटारी चेंबर अतिशय निकृष्ट


 पुणे: एक समान पातळीवर नसलेली सर्व रस्त्यावरील गटार चेंबर समान पातळीवर करण्याचे काम पूर्ण शहरात चालू असताना सुरु असलेली कामे आणि त्या नवीन बसवलेल्या चेंबरचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे. 

चेंबर काही दिवसच झालेले आहेत बसवून पुन्हा ते मोठया प्रमाणात खचून अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. असेच एक निकृष्ट दर्जाच्या कामाचे हे बोलके उदाहरण आहे आंबिल ओढा पीएमसी काॅलनीजवळे.  भाजपचे पुणे शहराध्यक्ष यांच्या साने गुरुजी तरुण मंडळाच्या जवळचे हे चित्र आहे. घाटे याच परिसरातील नगरसेवक आहेत.
त्यामुळे बाकी अन्य रस्त्यांवर काय परिस्थिती असेल याची कल्पना केलेली बरी!

पुणे पालिकेने चुकीच्या पद्धतीने आकारलेला २६८ कोटी रुपये कर

 'आपले पुणे आपला परिसर' ची आमदारांना आवाज उठविण्यासाठी विनंती

 

पुणे: विधानसभा मतदारसंघांमधील मिळून ३२ गावे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट केली आहेत त्या नागरिकांना न्याय देण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये समाविष्ट ३२ गावांतील मालमत्ता कर रचनेबाबत आवाज उठवावा, अशी मागणी आमदारांना करण्यात आली आहे.

'आपले पुणे आपला परिसर' चे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी 
आणि प्रशांत बधे यांनी विजय शिवतारे ,भीमराव तापकीर,चेतन तुपे पाटील, बापू पठारे, माऊली कटके, शंकर मांडेकर यांना पत्र लिहिले आहे.

उज्ज्वल केसकर यांनी सांगितले की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री  एकनाथजी शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या ३२ गावांच्या बाबत ग्रामपंचायत कर आकारणीच्या दुपटीने कर आकारणी करावी असे सांगितले आणि कर वसुलीला स्थगिती दिली. पुणे महानगरपालिकेने त्याप्रमाणे वसुली थांबवली.  तरीदेखील या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जवळपास २६८ कोटी रुपये कर भरणा महानगरपालिकेच्या तिजोरीत केला.

पुणे महानगरपालिकेने देखील या समाविष्ट गावांची कर आकारणी नियमांच्या अधीन राहून केलेली नाही. त्यामुळे त्याचा फेर विचार होणे आवश्यक आहे. कर आकारणी बाबत लोकांचा असंतोष चुकीचा नाही, असे आम्ही पत्रात म्हटले आहे. 

िद्रूपीकरण करणार नेते, कार्यकर्ते फ्लेक्स काढून टाकणार पुणे मनपा,!

पुणे: महापौर नियुक्ती नंतर शहरात जागोजागी अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर अनेक आठवडे जागीच आहेत. ज्यांनी किंवा ज्यांच्या समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी महानगरपालिका इतरांनी केलेले विद्रूपीकरण स्वतः मनुष्यबळ लावून दूर करत आहे.  त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होतो आहे.


भारतीय जनता पक्षाची फ्लेक्समुक्त पुण्याची घोषणा हवेतच विरली आहे. खासदार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अनधिकृत फ्लेक्स राजकीय लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. 

फ्लेक्स लावून शहर विद्रूप केल्यास त्यासाठी विद्रूपीकरण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. तथापि आमदार, खासदार, मंत्री यांच्या कार्यक्रमांचे किंवा वाढदिवस किंवा निवड नियुक्तीचेही फलक शहरभर दिसून येतात.

पुणे महानगरपालिकेच्या वतीने सिंहगड रोडवरील राजाराम पूल चौकात अनधिकृत जाहिराती लावल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देणारा फलक लावला आहे. मात्र त्या शेजारीच अनधिकृत बॅनर लावलेले दिसत होते. 

विशिष्ट चौक किंवा रस्त्यांवर ठरावीक राजकीय कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांचे फ्लेक्स लावले जातात. काही मंडळांनी आपापल्या भागात पक्के मचाण उभारुन व्यावसायिक जाहिरातदारांची सोय करुन कमाई सुरू केल्याचे दिसते. तरीही अनेक भागात महानगरपालिकेची बोटचेपी भूमिका असून किती गुन्हे दाखल केले आहेत याची माहिती पुढे आणली जात नाही.

ज्यांनी किंवा ज्यांच्या समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत त्यांच्यावर आणि ते लावणाऱ्या फ्लेक्स कंपन्यांवर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी महापालिका स्वतः विद्रूपीकरण दूर करण्यासाठी मनुष्यबळ खर्ची पाडत असल्याने पुणेकरांमध्ये नाराजी आहे.